top of page
Search
  • Writer's pictureNilesh Patil

सांडपाणी प्रकल्प उभारणीसाठी ग्रामपंचायतींना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे दिड कोटी रुपयां..

सांडपाणी प्रकल्प उभारणीसाठी ग्रामपंचायतींना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे दिड कोटी रुपयांपर्यंत बिन व्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबत आज पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.

गावागावांमध्ये वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे निर्माण होणारे सांडपाणी याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील नऊ गावांमध्ये हा प्रकल्प उभारण्यात येणार असून ग्रामपंचायतीनी गावांमध्ये हा प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

याशिवाय ज्या ग्रामपंचायतींना प्रकल्प आराखड्यासाठी दोन लाख रुपयांचा निधी मंजूर आहे त्यांनी येत्या चार दिवसांमध्ये प्रकल्प आराखडा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे द्यावा अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी गावांमध्ये उभारण्यात येणाऱ्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले.

गांधीनगर, गडमुडशिंगी आणि वळीवडे या तिन्ही गावामध्ये एक एसटीपी प्रकल्प तर उंचगाव मध्ये स्वतंत्र, कळंबा आणि पाचगाव व चंदुर आणि कबनूर गावांसाठी प्रत्येकी एक एसटीपी तर तळदगे गावामध्ये मध्ये स्वतंत्र एसटीपी प्रकल्प नियोजित आहे.

मात्र या बैठकीत सर्व या गावांनी स्वतंत्र आराखडे तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली असून तारदाळ, खोतवाडी, यड्राव आणि कोरोची ही चार गावे देखील नव्याने प्रस्तावित करण्यात आली आहेत.

यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी रवी आंधळे, उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, पाणी आणि स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे, जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मनीष पवार यांच्यासह संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, गटविकास अधिकारी, तहसीलदार, ग्रामसेवक आदी या बैठकीसाठी उपस्थित होते.



11 views0 comments
bottom of page